पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, आदी उपस्थित होते.
"संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आता मार्गस्थ होणार आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त यांनी याबाबत बैठका घेतल्या आहेत. वारीबाबत शनिवारी बैठक घेतली असून राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी वारीत संख्या वाढेल. तसेच दिवे घाटात काम सुरू आहे. यावेळी दिवे घाट चढत असताना वारकऱ्यांना अडचण येणार नाही. फ्लेक्स, जाहिरात फलक हे पालखी मार्गावरुन काढायला सांगितले आहेत. यावेळी काही सुधारणा केल्या आहेत. पोलीस हद्द संपली की वारी सोडत होते. पण काहीवेळ पुढे वारीसोबत जावं असं सांगितलं आहे," असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.