पालघर - इंद्रायणी नदीवरील पूल बांधण्यासाठी केवळ ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट वेळेवर दिलं नाही, अशी टीका राज्य सरकारवर करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "१० जून रोजी कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असलं तरी एवढ्या लवकर काम झालं नसतं. हा पूल धोकादायक आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं. गावकऱ्यांनीही तेथे पाटी लावली होती की, हा पूल धोकादायक आहे. तरीही पर्यटक त्या ठिकाणी आले. अनेकदा अशा गोष्टींकडं लक्ष दिलं जात नाही. पूल एवढा कमकुवत झाला असेल, असं पर्यटकांना वाटलं नसावं. म्हणून ते तेथे गेले. यातून भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या ५०० जागा आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. फक्त पुलच नव्हे तर इतरही गोष्टी आहेत. हे अधिक सजकतेने करावे लागेल. पर्यटक हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जातात. त्यांना अधिक सुरक्षित कसे ठेवावे लागेल, यावर लक्ष द्यावे लागेल."