नांदेड : राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यातिथीनिमित्त खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड मधल्या राजमाता जिजाऊ सृष्टी इथं अभिवादन केलं. यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून यांनी भाजपामध्ये केलेल्या प्रवेशावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था नात्या-गोत्याचा पक्ष अशी झाली आहे. काँग्रेस विरोधी पक्षात आहे. असं असलं तरी नुसत टीका करुन राज्य चालत नसतं. राज्याच्या प्रगतीसाठी कष्ट करावे लागतात. पुढचा आराखडा तयार करावा लागतो. कार्यकर्त्यांना उत्साही ठेवून त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवानं यापैकी कोणतीच बाब महाराष्ट्रात होत नाही. काँग्रेस नेतृत्वहीन झाल्यामुळं सांगलीमध्ये घडामोडी घडल्या," असं म्हणत खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका केली. उल्लेखनीय गोष्ट म्हमजे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या सांगलीच्या वसंतदादा घराण्यातील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि काँग्रेस बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटल यांनी कालच भाजपात प्रवेश केलाय.