पुणे - जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं रविवारी पुण्यातून प्रस्थान केलं. रविवारी माऊलींच्या पालखीने टाळ मृदंगावर ठेका धरत सगळ्यात कठीण टप्पा समजला जाणारा दिवेघाट पार केला. वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर करत उत्साहात हा कठीण असणारा दिवे घाट पार केला. लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विहंगम दृष्य पाहायला मिळालं. यापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं पुण्यात दोन दिवस मुक्काम केला. यावेळी लाखो पुणेकरांनी पालखीचं दर्शन घेतलं. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं दिवेघाटाची अवघड चढण पार केल्यानंतर सासवड येथे मुक्कामी आहे. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर मार्गे पुढे जाऊन लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहे.