नंदुरबार : पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देत गौरवमुर्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते आपल्या अनुभव सांगताना भारावून गेले होते. कुणी मुलांपासून लांब झालं तर कोणी परिवारापासून या सर्व कळवट आठवणी पुन्हा डोळ्यासमोर आल्यानं सर्वजण भारावून गेले होते. तर आणीबाणीच्या कालखंडात जिल्ह्यातील ज्या गौरवमुर्तींना कारावास भोगावा लागला त्यांच्या संघर्ष आणि लढ्यामुळं लोकशाही बळकट झाली असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केलं. तर आणीबाणीच्या काळ्याकुट्ट आठवणींना बुधवारी (25 जून) 50 वर्षे झाली. लोकशाहीची गळचेपी होताना त्यावेळी आम्ही लढलो आणि आजही लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढायची तयारी आहे. शासनाने आणीबाणीच्या कारावास भोगलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ केली आणि सन्मानपत्र देवून यथोचित गौरव केल्याबद्दल शासनाचे आभार मानत प्रसिद्ध साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी भविष्यात मानधनाबाच्या तफावतींबद्दल मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. तर देशाला स्वातंत्र्य मिळालं, लोकशाही प्रस्थापित झाली तरीही आपल्या मुलभूत अधिकारांपासून जनता वंचित होती, त्यासाठी आमचा लढा सुरू होता. या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. अक्षरशः माझ्या लहान मुलाचं संगोपन करताना मला अटक केली. परंतु, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या हक्कांसाठी आमचा लढा आम्ही कायम ठेवला आणि ते भविष्यातही कायम राहिल, असं सांगत सरकारने आम्हाला पन्नास वर्षांनी गौरवित केले, त्याबद्दल ज्येष्ठ कादंबरीकार नजूबाई गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.